आम्ही साहित्यिककरमाळाराज्य

वाचकाचे समाज भान जागे करणारे “माझं शिवार” काव्यसंग्रह – समीक्षक खाजाभाई बागवान

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

वाचकाचे समाज भान जागे करणारे “माझं शिवार” काव्यसंग्रह – समीक्षक खाजाभाई बागवान

एका छोट्या गावात राहून आपले उच्च शिक्षण पूर्ण करने हे आज सोपे जरी झाले असले तरी एका मुस्लिम स्त्री साठी हे अजून कठीण परीक्षाच आहे. दहावी किंवा बारावी नंतर मुस्लिम मुलींचे शिक्षण थांबवले जाते ही जरी परिस्थिती असली तरी नूरजहाँ शेख यांच्या वडिलांनी नूरजहाँ शेख यांचे एम. ए. हिंदीमध्ये पूर्ण करण्यासाठी आपल्या मुलीला मोलाचे मार्गदर्शन केले.वडिलांच्या व पतीच्या सहकार्याने कवयित्रीने साहित्य क्षेत्रात आपले पहिले पाऊल ठेवले. २०१५ मध्ये कवयित्री नूरजहाँ शेख यांचे “मन कि लहरे ” हा हिंदी कवितासंग्रह प्रकशित झाला आहे. त्यानंतर मराठी कविता संग्रह ” माझं शिवार ” हा पहिला कविता संग्रह वाचक रसिकांच्या हाती दिला आहे.

हा काव्यसंग्रह वाचताना मनाला सुखद व दुखद जाणीवाचा अनुभव घेता आला. कवयित्री नूरजहाँ शेख यांनी विविध विषय आपल्या काव्यसंग्रहात हताळले आहेत. जे अनुभव नूरजहाँ यांनी घेतले ते अगदी सहज सोप्या भाषेत त्यांनी काव्यरुपात मांडले आहे.कवयित्री नूरजहाँ शेख यांनी आपले काव्यसंग्रह देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व शहीद जवान आणि सीमेवर तैनात असणाऱ्या सर्व जवान यांना ही साहित्यकृती अर्पण केली आहे. यातूनच त्यांची देशाच्या प्रतीची आस्था सिद्ध होते. काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ अत्यंत मनमोहक आहे. वाहणारी नदी व तिचा काठ त्यावर फुललेले शिवार आणि आकाशात उडणारे पक्षी असे काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ तांबोळी ए.जी. यांनी साकारले आहे.तर प्रस्तावना जेष्ठ साहित्यिक नारायण सुमंत यांनी दिली आहे.स्त्री वादावर भाष्य करणारा हा काव्यसंग्रह स्त्रियांच्या अनेक प्रश्नांना वाचा तर फोडतच त्याचबरोबर समाजतील अनेक प्रश्नावर कवयित्री नूरजहाँ शेख यांनी भाष्य केले आहे. पुढऱ्यांचे पोकळ आश्वासने, भ्रष्ट राजकारण, शेतकऱ्यांचे प्रश्न, समाजातील जातीयवाद अशा मुख्य प्रश्नावर व समाज भान बाळगणाऱ्या कविता कवयित्री नूरजहाँ शेख यांनी आपल्या काव्यसंग्रहात रेखाटल्या आहेत.
काव्यसंग्रहात एकूण ७४ कविता असून बहुतांश कविता मुक्तछंदात आहेत परंतु त्यांना एक विशिष्ट ढाचा व लय आहे.

मनपाखरू, स्वछंद, शब्दकळ्या, शब्दफुले ह्या कवितामध्ये नूरजहाँ यांनी आपल्या मनातील खदखद व मनातील विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

लढा, पोकळी, शोधते मी, जाग बये, मला जगायचंय, जखमी मन, महिला दिन, पोरी सांभाळ गं, नराधम, कुबुल है म्हणताना, ऊन सावली व सुखी संसार ह्या कविता मध्ये कवयित्री स्त्री प्रश्नावर भाष्य करतात. यातील कुबुल है म्हणताना ह्या कवितात मराठी मुस्लीम संस्कृती तर दाखवलीच आहे त्याचबरोबर एक मुस्लीम स्त्रीचे लग्न होतानाची मनातील घालमेल कवयित्री नूरजहाँ शेख रेखाटताना म्हणतात

“अंतःकरण हेलावते
कंठ येतो दाटून
कुबुल है म्हणताना “

ऊन सावली कवितेत कवयित्री नूरजहा शेख माहेर व सासर ह्यातील फरक मांडताना व आलेला अनुभव रेखाटताना कवयित्री लिहितात

“माहेरात मिळे मज उब मायेची
सासर देई सदा धग ग्रीष्माची”

पाषाणाची दुनिया,मुखवटे, कुटुंब नियोजन, फॅशन, वाट, नारळ या कवितातून समाज प्रबोधन नूरजहाँ शेख करतात.

कसला नेता हवा गं बाई?, चार पायाची अवदसा, खेकड्यांचे आंदोलन, भारूड, जिंकू किंवा हारू, तर तू नेता बनशील, लढाई, पुढारी कोल्हे, चतुर लांडगे या कवितातून कवयित्री नूरजहाँ शेख यांनी राजकारण व समाजातील भ्रष्ट राजकारणी यांच्यावर टीका या कवितातून करतात.

आम्हीच आणली अशी वेळ, डासांची सभा, त्यात काय नवल?, निसर्गाची किमया, आरं आरं आवकाळया, मरायचं न्हाय, सावर पुन्यान्दा, जुगार, झालं ओसाड माळरान, का रे?, काळी माय, मरान, वेदना, ढग रुसले, वाघोबा येतोय माणसात, भस्मासूर या कवितातून कवयित्री नूरजहाँ शेख यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या व्यथा, दुःख, वेदना, समस्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. काही कवितामध्ये नूरजहाँ यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याचा व आत्महत्या हे समस्या समाधान नाही समस्यावर मात करा संकटाना सामोरे जा त्यावर तोडगा काढा असे प्रेरणादायी लेखन नूरजहाँ यांनी केले आहे.

हेही वाचा – तरुणांनो तुमच्या धडावर तुमचाच मेंदू असुद्या, जग जिंकता येते; शारदा व्याख्यानमालेत जगदीश ओहोळ यांचे प्रतिपादन

पाणी पिण्यासाठी गेलेली गाय उजनीच्या गाळात फसली; मच्छीमारांच्या सतर्कतेमुळे सुटका!

पैसा, आजार साखरेचा, ए भाऊ, नातं, आई बाप , घरटे मायेचे, नाती, खुळ्यांचा बाजार, भानामती, बेगड, रुप खरे, मारेकरी ह्या प्रबोधनपर कविता नूरजहाँ यांनी केल्या आहेत.

दहशत अंकल, मलाला, क्रांतीज्योती, पाक डी, शहीदांनो, रक्तमाती, मातृभूमीसाठी, बापू, स्वर्ग या कवितेत देशभक्ती व देशप्रेम कवयित्री नूरजहाँ शेख यांनी व्यक्त केले आहे.

काव्यसंग्रहाचे शेवट करताना कवयित्री नूरजहाँ शेख लिहितात

शिवारात या माझ्या
शब्दबीज मी पेरले
जेव्हा वादळ विचारांनी
मजला होते घेरले

“माझं शिवार” ह्या कवितेत संपूर्ण मनाचा ठाव व आपल्या लेखणीची ओळख या कवितेत कवयित्री व्यक्त करतात.

कवयित्री नूरजहाँ शेख ह्यांच्या हातून अशीच वेगळी लेखन क्रांती घडो अशी इच्छा व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा…..

काव्य संग्रह

माझं शिवार -कवयित्री.नूरजहाँ शेख
प्रकाशक – ग्रंथ मित्र प्रकाशन
प्रथम आवृत्ती -२०१५
मूल्य -१००/-फक्त

litsbros