महाराष्ट्र

राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळणार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळणार

मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. नागरिकांना कधी उन्हाच्या झळा, तर कधी थंडीच्या कडाक्याचा सामना करावा लागत आहे. त्यातच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काही भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळत आहे. येत्या ३-४ तासांत राज्यात अवकाळी पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

भारतीय हवामान खात्याकडून काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, रायगड, बीड, सातारा जिल्ह्यांमध्ये अवकाळीचा अंदाज आहे. 

त्याचबरोबर तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता असून वाऱ्याचा ताशी वेग ३० ते ४० किमी असण्याची शक्यता आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना देखील अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला आणि बुलढाण्यात देखील आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

रविवारी मुंबईसह उपनगरात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात गारवा तयार झाला होता. गेल्या आठवडाभरापासून मुंबईत उकाडा जाणवत होता. या पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, पुढील दोन दिवस मुंबई, ठाण्यासह उपनगरात अवकाळी पाऊस होऊ शकतो, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

litsbros

Comment here