विठ्ठलवाडी येथे ठिकठिकाणी केरकचरा व प्लास्टिक पिशव्यांचे साम्राज्य स्वच्छतेसाठी सरसावली शाळकरी मुले ; विद्यार्थ्यांनी केली ग्रामस्वच्छता व साफसफाई

विठ्ठलवाडी येथे ठिकठिकाणी केरकचरा व प्लास्टिक पिशव्यांचे साम्राज्य

स्वच्छतेसाठी सरसावली शाळकरी मुले ; विद्यार्थ्यांनी केली ग्रामस्वच्छता व साफसफाई

माढा / प्रतिनिधी –माढा तालुक्यातील शासनाचे अनेक पुरस्कार प्राप्त व शासकीय नोकरदारांचे गाव म्हणून ओळख असलेल्या विठ्ठलवाडी गावात सध्या ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ठिकठिकाणी केरकचरा,चिखल,घाण पाणी,प्लास्टिक पिशव्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.स्वच्छतेअभावी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भिती निर्माण झाली आहे त्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

यावर ग्रामपंचायतीकडून कसलीच उपाययोजना झाली नाही.जणू काही याचीच दखल घेऊन संभाजीराव चव्हाण माध्यमिक विद्यालयातील 50 विद्यार्थ्यांनी हातात झाडू,खो-या,पाटी घेऊन उस्फूर्तपणे रविवारी 6 ऑगस्ट रोजी गावात स्वच्छता मोहीम राबविली त्याबद्दल त्यांचे सुज्ञ व जागरूक नागरिकांनी तोंडभरून कौतुक केले.

माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल चव्हाण यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना सुमारे दोन तास स्वच्छता मोहीम राबवून ग्रामदैवत श्री विठ्ठल-बिरुदेव मंदिर, हनुमान मंदिर,विठ्ठल रुक्मिणी मंदिर,मरिआई मंदिर परिसर,माढा ते विठ्ठलवाडी रोडचा काही भाग,गावातील वेसीचा परिसर व मुख्य चौक,समाजमंदिर, ग्रामपंचायत कार्यालय परिसर, अंगणवाडी परिसर,दलित वस्तीचा काही भाग खैरेवाडी,लोंढेवाडी व विठ्ठलवाडीतील विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला.जमा झालेला कचरा एकत्र गोळा करून ज्वलनशील कचरा जाळून टाकला तर ओलसर कचरा गावाबाहेर दूर खड्ड्यांत नेऊन टाकला.सर्व विद्यार्थ्यांकडून साफसफाई,कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रगतशील शेतकरी हनुमंत मस्के, शिवाजी जाधव,विठ्ठल गाडे यांनी पुढाकार व परिश्रम घेतले.

ग्रामपंचायतीचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष आहे त्यामुळे ठिकठिकाणी केरकचरा,घाण, पालापाचोळा,प्लास्टिक पिशव्यांचे साम्राज्य निर्माण होऊन दुर्गंधी पसरते.गावात फवारणी व निर्जंतुकीकरणासाठी पावडर टाकली जात नाही.वेळोवेळी या बाबी ग्रामपंचायत प्रशासनास निदर्शनास आणून दिल्या जातात परंतु याकडे त्यांचे दुर्लक्ष आहे.सध्या पावसाळा सुरू असल्याने अनेक ठिकाणी केरकचरा,चिखल,घाण पाणी साचून दुर्गंधी पसरुन डासांची उत्पत्ती झाली आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.ही बाब गंभीर व चिंताजनक असूनही ग्रामपंचायतीकडून उपाययोजना झाली नाही त्यामुळे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जी ग्रामस्वच्छता मोहिम राबविली ही बाब निश्चितच कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया माजी सरपंच बालाजी गव्हाणे यांनी दिली आहे.

 विद्यार्थ्यांमध्ये शालेय स्तरापासूनच श्रमदान व श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व रुजावे,त्यांच्यामध्ये ग्राम स्वच्छतेची आवड व गोडी निर्माण व्हावी,शाळेत शिकवले जाणारे कार्यानुभव व समाजसेवा विषय प्रत्यक्षात कृतीत उतरविण्याच्या उद्देशाने विद्यालयातील 142 विद्यार्थ्यांना स्वयंस्फूर्तीने दर रविवारी किमान एक ते दोन तास ग्रामस्वच्छता मोहीम राबविणेबाबत मार्गदर्शन केले होते.त्यानुसार 6 ऑगस्ट रोजी सुमारे 50 विद्यार्थ्यांनी ग्रामस्वच्छता करून गावातील बराच मोठा परिसर स्वच्छ केल्याची माहिती मुख्याध्यापक अमोल चव्हाण यांनी दिली आहे.

हेही वाचा – मारुती फडके यांची सोलापूर जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी नियुक्ती

रिल्स पाहून ते मित्र हरिश्चंद्र गडावर ट्रेकिंगला गेले; जंगलात हरवले, एकाचा मृत्यू तर…

फोटो ओळी – 1) विठ्ठलवाडी ता.माढा येथे खैरेवाडीकडे जाणा-या रस्त्याच्या मुख्य चौकात केरकचरा,घाण व प्लास्टिक पिशव्यांचे ढीग साचल्याचे चिंताजनक दृश्य.

2) विठ्ठलवाडी ता.माढा येथे रविवारी स्वच्छता मोहीमेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यीनी.

3) विठ्ठलवाडी येथे रविवारी 6 ऑगस्ट रोजी स्वच्छता मोहीमेत सहभागी झालेले विद्यार्थी.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line