राज्यात पुढील ४८ तासांत अवकाळी पावसाचा अंदाज; हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

राज्यात पुढील ४८ तासांत अवकाळी पावसाचा अंदाज; हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसून येत आहेत. कधी उन्हाचा तडाखा, तर कधी अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहे. बदलत्या वातारवरणामुळे काही भागात उष्णतेची लाट सुद्धा आली आहे. अशातच राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. 

येत्या ३१ मे रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांत अवकाळी पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे. हवामान खात्याच्या या अंदाजामुळे बळीराजाचं टेन्शन वाढलं आहे.

विशेष बाब म्हणजे, रविवारी हिंगोली, भंडारा, गोंदिया, नागपूरसह अन्य काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. गारा आणि विजांच्या कडकडाटासह विदर्भातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे उष्णतेपासुन काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, राज्यातील काही शहरांचा कमाल तापमानाचा पारा चाळीस अंशांपर्यंत घसरला आहे. आता नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तर येत्या दोन दिवसांत पाऊस अंदमान, निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग व्यापणार आहे.

राजस्थान ते मध्य प्रदेशपर्यंत चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तर दक्षिण भारताकडून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे वाहत आहेत. या स्थितीमुळे राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या जवळपास सर्वच भागांमध्ये मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस बरसणार आहे.

karmalamadhanews24: