ग्रामीण भागातील कृषीविषयक दुकाने ‘या’ वेळेपर्यंत राहणार सुरू;जिल्ह्याधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश
सोलापूर :जिल्ह्यातील कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासनाने जीवनाश्यक दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे, मात्र शेतकऱ्यांचा खरीप हंगाम महत्वाचा असल्याने पोलीस
आयुक्तालय हद्द वगळून ग्रामीण भागातील कृषीविषयक दुकाने आता सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत कोरोनाचे नियम पाळून सुरू राहतील.याबाबतचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश दिले.
शेतकऱ्यांचा खरीप हंगाम आणि राज्य शासनाच्या कृषी आयुक्तांच्या पत्रानुसार कृषी दुकानांच्या वेळेत शिथिलता आणली आहे. यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद हद्दीत कृषीविषयक
बियाणे, खते, किटकनाशके, शेतीशी निगडीत असलेली कृषी सेवा केंद्र सकाळी ७ ते दुपारी २ या काळात चालू राहतील.कृषीविषयक दुकाने चालू ठेवताना पाळावयाचे नियम कृषीसेवा केंद्र चालक, काम करणारे कामगार, शेतकरी यांनी मास्क वापरणे बंधनकारक असेल. केंद्राच्या परिसरात वावरताना दोन व्यक्तीमध्ये किमान
सहा फुटाचे सामाजिक अंतर राखावे. केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांना वेळ देऊन त्यानुसार कृषी निविष्ठा वाटपाचे नियोजन करावे.
हेही वाचा-जेऊरच्या ‘या’ दोन मोठ्या व्यापाऱ्यां विरोधात करमाळा पोलिसात गुन्हा दाखल
कृषी विभागाच्या समन्वयाने केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर खते, बियाणे पुरवठा करण्याबाबत इ-कॉमर्सचा वापर करून नियोजन करावे.
वाहनांची गर्दी टाळण्यासाठी पार्किंगचे नियोजन करावे.
आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम १८८ मधील तरतुदीनुसार आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
Comment here