सोलापूर जिल्हा वंचित बहुजन युवा आघाडीने केली गृहमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी
करमाळा (प्रतिनिधी); महाराष्ट्रात दिवसेंदिवस भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन जातीय तेढ निर्माण करुन, स्वतःच्या पक्षाची राजकिय पोळी भाजण्याचे मोठे षडयंत्र सध्या सुरु असल्याचा घणाघाती आरोप वंचित बहुजन युवा आघाडीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी केला आहे.
यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेल करुन गृहमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तरी पुढे बोलताना वाघमारे म्हणाले कि, बोंढार (हवेली) ता. जि. नांदेड येथील बौध्द तरुण अक्षय भालेराव याची तेथील गावगुंडांनी निर्घृणपणे हत्या केली आहे. हत्येमागचे कारण सुध्दा जनमाणसाला न पटणारे असेच आहे. गावामध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अक्षय भालेराव याने का काढली? या जातीय रोषातुन जातीयवादी गावगुंडांनी संबंधित युवकाची निर्घृणपणे हत्या केली. तरी आतापर्यंत संबंधित घटनेसंदर्भात कोणत्याही राजकिय पुढाऱ्याने साधे भाष्य सुध्दा केले नाही.
हिच या महाराष्ट्रातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. अशा परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पिडित कुटूंबाला न्याय मिळवून देण्यासाठी, संबंधित आरोपींवर कठोर शासन करण्याची मागणी केली आहे.
पुढे बोलताना वाघमारे यांनी सांगितले कि, जर पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष महाराष्ट्रात अशा जातीयवादातुन बौध्द तरुणांवर हल्ले करुन, त्यांची निर्घृणपणे हत्या केली जात असेल तर, आता शासनाने सुध्दा बौद्ध तरुणांना शस्त्र बाळगण्याचा सर्रास परवाना द्यावा. अशी प्रमुख आम्ही शासनाकडे करत आहोत.
त्याचप्रमाणे संबंधित आरोपीना अद्यापपर्यंत जर पोलीस प्रशासनाने अटक केली नसेल तर, पोलीस प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे? हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. गृहमंत्री सुध्दा या प्रकरणात साधा एक चकार शब्द सुध्दा काढत नसतील, तर ते आरोपींना पाठीशी घालत आहेत का? अशी आम्हाला दाट शंका येत आहे.
तरी महाराष्ट्रातील समस्त समाजमनाचा विचार करुन संबंधित कुटूंबाचा सहानुभूतीपुर्वक विचार करावा. अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे उग्र स्वरुपाची आंदोलने केली जातील. अशा प्रकारचा महाराष्ट्र शासनाला इशारा साहेबराव वाघमारे यांनी दिला आहे.
Comment here