करमाळामाणुसकी

यावर्षीचा अमर ऊर्जा पुरस्कार भामरागड येथे समाजबंधला प्रदान

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

यावर्षीचा अमर ऊर्जा पुरस्कार भामरागड येथे समाजबंधला प्रदान

केत्तूर (अभय माने) पु. ल. देशपांडे कलादालन, दादर येथे पार पडलेल्या सोहळ्यात अमर हिंद मंडळाचा नामांकित ‘अमर ऊर्जा पुरस्कार’ शनिवार (ता..२० ) रोजी समाजबंध या संस्थेस देण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि 50,000 /- ₹ असे या पुरस्काराचे स्वरूप असून कलादालनाचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते सचिन आशा सुभाष व शर्वरी यांनी स्वीकारला. सचिन आशा सुभाष हे करमाळा तालुक्यातील केत्तुर येथील मूळ रहवासी आहेत.

2016 पासून मासिक पाळी या विषयावर समाजबंध करत असलेल्या प्रबोधनात्मक कार्याची दखल घेत विविध पातळ्यांवर पडताळणी करून या पुरस्कारासाठी समाजबंधची निवड करण्यात आली.

मासिक पाळीविषयी जनजागृती करणे, कापडी आशा पॅड तयार करणे आणि ते बनवण्याचं प्रशिक्षण देणे असे तीन पातळ्यांवर महाराष्ट्राच्या आदिवासी आणि ग्रामीण भागात समाजबंध काम करते. यावेळी अमर हिंद मंडळाचे सचिव रवींद्र ढवळे यांनी मंडळाविषयी माहिती दिली. तर सीमा कोल्हटकर यांनी मानपत्र वाचून दाखवले तसेच संस्थेच्या कामाविषयी मंडळाने बनवलेली चित्रफीत ही यावेळी दाखवण्यात आली.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना कार्यकर्ता सचिन आशा सुभाषने समाजबंधच्या कामाविषयी थोडक्यात माहिती देत भामरागड, गडचिरोली मधील परिस्थिती व सत्याचे प्रयोग शिबिराविषयी ही सांगितले.

भामरागड मधील 17 गावात समाजबंधच्या कामाला प्रतिसाद देत मोठ्या धाडसाने आणि स्वयंप्रेरणेने हे काम पुढे नेत असलेल्या आरोग्य सखींना हा पुरस्कार अर्पण करत पुरस्कारात मिळालेल्या रकमेतून आरोग्य साखींना प्रोत्साहनपर मानधन सुरू करण्यात येईल असं यावेळी कृतज्ञतापूर्वक जाहीर केले.

समाजबंध सोबतच आदिवासी सहज शिक्षण परिवार- पालघर, Helping Hands- कल्याण आणि अहिल्या महिला मंडळ- पेण अशा चार संस्थांना हा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी देशभक्तीपर गाणी आणि नृत्य यांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संतोष रोकडे यावेळी म्हणाले की शासनाच्या अनेक महत्वाकांक्षी योजना सत्यात उतरविण्यात सामाजिक संस्थांचे मोलाचे योगदान आहे.

मंडळाचे अध्यक्ष भास्कर सावंत म्हणाले या पुरस्कारासाठी संस्थांची निवड करत असताना संस्थांचे वेगवेगळ्या विषयातील काम जाणून घेताना आम्हालाही ऊर्जा मिळाली. असे यानिमित्ताने ऊर्जेचे, विचारांचे आदानप्रदान होत राहणे फार गरजेचे आहे. यावेळी वरील मान्यवरांसोबतच अरुण देशपांडे, दीपक साडविलकर, इतर कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.

litsbros

Comment here