श्री.आदिनाथ गळीत हंगाम शुभारंभाला मुख्यमंत्री शिंदेची उपस्थिती.. राजकीय आखाड्यात कोणाला होणार फायदा? पाटील की बागल कोणाला मिळणार बळ?
करमाळा (प्रतिनिधी); करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या येत्या 25 डिसेंबर रोजी होणाऱ्या मोळी टाकण्याच्या शुभारंभाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजीराव शिंदे हे येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी चालू आहे. सदरच्या कार्यक्रमाला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, माजी मंत्री राम शिंदे भैरवनाथ शुगरचे संस्थापक शिवाजीराव सावंत युवा नेते दिग्विजय बागल पैलवान पृथ्वीराज पाटील, आदिनाथ कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे व्हाईस चेअरमन रमेश कांबळे व कारखान्याचे सर्व संचालक तसेच सोलापूर जिल्ह्यातील शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या मोळी टाकण्याच्या कार्यक्रमाला प्रथमत:च येत असल्याने हा विषय सोलापूर जिल्ह्यात राजकीय चर्चेचा झाला आहे. सध्यातरी जिल्ह्याचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे.
पण भविष्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करमाळा तालुक्यातील कोणत्या गटाला झुकते माप देणार.? राजकीय आखाड्यात कुणाला बळ देणार? मुख्यमंत्री आपला आशीर्वाद कोणाला देणार? माजी आमदार नारायण आबा पाटील की बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल? याकडे संपूर्ण तालुकावासियांचे लक्ष लागले आहे. यावर ही चर्चा झडत आहेत.
एकमेकांचे राजकीय स्पर्धक असणारे बागल आणि पाटील हे आदिनाथच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. पण आपली भविष्यातील राजकीय वाटचाल मात्र स्वतंत्र असेल असे दोघेही सांगत आहेत. श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी परिश्रम घेत खटाटोप करणारे, गुवाहाटी प्रकरणानंतर शिंदे यांना उघड पाठिंबा देणारे माजी आमदार नारायण आबा पाटील हे देखील आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कट्टर समर्थक मानले जात आहेत. तसेच माजी आमदार पाटील यांनी करमाळा तालुक्याच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिंदे गटाचा वर चष्मा कायम ठेवून सर्वाधिक जागा मिळून आपला दबदबा कायम ठेवला आहे.
तर बागल गटाने ही श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी कधी नव्हे ते यावेळेस पाटील गटाशी हात मिळवणी करून श्री आदिनाथ साखर कारखाना चालू करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. पण त्यांच्या या सहभागात मंत्री तानाजी सावंत यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.
तर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या रश्मी बागल या आता मात्र कोणत्या शिवसेनेत आहेत? हे अजून गुलदस्त्यातच आहे.
सदर श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना बॉयलर उद्घाटन कार्यक्रमाचे किंगमेकर राज्याचे आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांना मानले जात आहे. मागील विधानसभा निवडणुकीत रश्मी बागल यांना यांना सेनेत घेऊन तिकीट मिळवून देणारे सावंत विधानसभा निकाला नंतर मात्र करमाळा तालुक्यात बॅकफूटवर गेल्याचे दिसून आले. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मंत्री सावंत हे करमाळा तालुक्यातील आपली ताकत व गट पुन्हा मजबूत करताना दिसून येत आहेत.
पण मंत्री सावंत आता पुढे करमाळा तालुक्यातील राजकीय पटलावर पाटील गटाला की बागल गटाला बळ देणार.? हे देखील कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून येणार आहे.
एकंदर पाहता राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा करमाळा तालुक्याचा दौरा कोणाला लाभदायक ठरणार? आणि कोणाला त्रासदायक ठरणार? हे येत्या रविवारी होणाऱ्या कार्यक्रमामधूनच दिसून येणार आहे.
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामासाठी एकमेकाचे कट्टर विरोधक मात्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर दिसणार असून ते आपल्या भाषणात काय बोलणार.? याकडे देखील लक्ष लागले आहे.
करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांनी एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे पाटील व बागल यांना एकत्रित करून एक प्रकारे राजकीय मुसद्दिपणा दाखवला आहे.
मात्र दोघांची युती ही फक्त आदिनाथ सहकारी साखर कारखान्या पुरतीच मर्यादित असून भविष्यात दोन्ही गट आदिनाथ कारखाना अखेरपर्यंत चालू करण्यासाठी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खरा न्याय देण्यासाठी एकमेकांना साथ देतील का? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे.
|| करमाळा माढा न्यूज विशेष ||
राज्याचे मुख्यमंत्री आदिनाथच्या गाळप हंगामाच्या शुभारंभासाठी येत असून माननीय मंत्री महोदयांनी देखील या दोन्ही गटातील नेत्यांना आपल्या भाषणातून समज देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खरा न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी देखील ऊस उत्पादक शेतकरी वर्गांमधून जोरदार मागणी होत आहे.
मात्र येत्या 25 डिसेंबर रोजी होणाऱ्या या गळीत हंगामाच्या शुभारंभाच्या वेळी माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्या अभ्यासमय भाषणातून दोन्ही गटातील नेत्यांना कोणता संदेश देणार याकडे तालुका नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.
दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांवर कुरघोडी न करता श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खरं न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी देखील होत आहे.
Comment here