करमाळा नगरपालिकेने ‘त्या’ 62 सफाई कामगारांना कायम सेवेत घ्यावे; अन्यथा तीव्र आंदोलन करू
करमाळा (प्रतिनिधी) करमाळा नगरपालिकेतील 62 रोजंदारी सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सफाई कर्मचारी म्हणून नगरपालिकेमध्ये घ्यावे अशी मागणी नगरसेविका सौ सविता जयकुमार कांबळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवलेल्या एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, आज संपूर्ण भारत देश व महाराष्ट्र राज्य कोरोना च्या संकटाचा सामना करत आहे. या पार्श्वभूमीवर करमाळा नगर परिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान खूप मोठे आहे.
करमाळा नगर परिषदेतील रोजंदारी सफाई कामगारांनी कोरोना च्या भीषण महामारी मध्ये एक दिवस देखील सुट्टी न घेता खूप मोलाचे योगदान दिले आहे. सफाई कर्मचारी शहराच्या स्वच्छता यंत्रणेचा कणा आहेत . एकीकडे शासन त्यांचा गौरव करत असताना आणि प्रधानमंत्री स्वच्छता अभियान राबवून त्यांच्या श्रमाचे कौतुक केले जात आहे.
परंतु करमाळा नगर परिषदेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांची मात्र आर्थिक कोंडी केली जात आहे या प्रश्नावर पालिका प्रशासनाने लवकरात लवकर उपाय काढणे गरजेचे आहे तसेच या कर्मचाऱ्यांना सरकारी तसेच बिगर सरकारी योजनांचाही लाभ मिळत नाही.
ही कोंडी लवकरात लवकर सोडून नगरपालिका प्रशासनाने कोविड – १९ काळामध्ये या 62 सफाई कर्मचाऱ्यांनी बहुमोल सेवा दिल्याबद्दल त्यांना पालिका प्रशासनाने कायमस्वरूपी सफाई कामगार म्हणून सेवेत सामावून घ्यावे व कर्मचाऱ्यांचा उचित सन्मान करावा . अन्यथा आम्ही तीव्र स्वरूपाचे उपोषण करणार आहोत, असे नगरसेविका सविता कांबळे यांनी निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे.
Comment here