मोफत धान्याने दिला गोरगरीबांना आधार, पण करमाळा तालुक्यात धान्य घोटाळा होण्याची शक्यता वाढली- वाचा सविस्तर
केतूर (अभय माने) कोरोना संसर्गामुळे लॉकडाउन काळात व्यवसाय, मजुरी सर्वकाही बंद असल्याने घरात येणारी आवकच बंद झाल्याने या परिस्थितीत घरातील चूल तरी कशी पेटणार ? या काळजीत गोरगरीब जनता होती परंतु या संकटकाळात सरकार गरिबांच्या मदतीला धावून आले असून स्वस्त धान्य दुकानातून गोरगरीब जनतेला मे महिन्यात लाभार्थी रेशन कार्डधारकांना राज्य तसेच केंद्र शासनाकडून फुल ना फुलाची पाकळी देत मोफत धान्याचे वाटप सुरू केले आहे.
करमाळा तालुक्यात पुरवठा विभागाकडून मोफत धान्याचे प्रत्येक गावात वाटप सुरू झाले असून लाभार्थी रेशन कार्ड धारकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
लॉकडाऊन काळात स्वस्त धान्य दुकानातील धान्य गोरगरीब जनतेला मोठा आधार ठरले आहे. राज्य शासनाकडून लाभार्थी कार्डधारकांना प्रति माणशी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ तर अंत्योदय कार्डधारकांना 25 किलो गहू व दहा किलो तांदूळ दिला जात आहे. केंद्र सरकारकडून तीन किलो गहू दोन किलो तांदूळ प्रतिमाणसी दिला जात आहे.
धान्य वितरणाच्या वेळी लाभार्थी ग्राहकाकडून पॉझ मशिनवर रेशन कार्ड धारकांचा थंब (अंगठा) घेतला जात होता परंतु,कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग वाढू नये म्हणून पॉझ मशीनवर थंब (अंगठा) घेणे बंद करण्यात आले आहे. मात्र यामुळे गावागावात गोरगरिबांचा धान्य घोटाळा होण्याची शक्यता मात्र वाढली आहे.
हेही वाचा-पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांची शेलगाव (वां) येथे भेट व नागरिकांना आवाहन
मोफत धान्य वाटप सुरू आहे लाभार्थ्यांनी दुकाना समोर गर्दी न करता कोरोनाचे नियम, अटी, बंधने पाळून व मास्कचा वापर करावा
-देवराव नवले, रेशन दुकानदार,केतूर.
कोरोना नियमांचे पालन करुन धान्य वाटप करीत आहे लाभार्थी रेशन कार्ड धारकांनी लवकरात लवकर आलेल्या धान्याची उचल करावी.
-अण्णा मोरे, केत्तूर.
Comment here