श्री.आदिनाथ साखर कारखाना फिनिक्स पक्ष्याप्रमाणे यशस्वी झेप घेईल; गाळप हंगाम शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
करमाळा (प्रतिनिधी); सहकारी साखर कारखान्यांचे अस्तित्व टिकवून राहण्याची गरज असुन आदिनाथ कारखाना फिनिक्स पक्षाप्रमाणे परत एकदा भरारी घेईल. या कारखान्यास राज्यसरकार सर्वोतोपरी मदत करेल असे ठोस आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा गेली तीन हंगाम गाळपापासून वंचित हौता. तसेच सदर कारखाना बारामती अॅग्रोने भाडेपट्टी तत्वावर चालविण्यासाठी घेतला होता.
परंतू राज्यात सत्तापालट झाल्यानंतर मात्र माजी आमदार नारायण पाटील व रश्मी बागल यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने न्यायालयात तसेच शासनाकडे दाद मागून हा भाडेपट्टी करार रद्द करण्यास बँकेस भाग पाडले. यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत व भैरवनाथ युनिटचे सर्वेसर्वा शिवाजीराव सावंत यांनी आर्थिक मदत तसेच राजकीय पाठबळ देऊन महत्त्वाची भुमिका पार पाडली.
पहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आजचे संपूर्ण भाषण👇
यानंतर आज या कारखान्यावर मोळी पुजनाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी झालेल्या सभेस संबोधन करताना मुख्यमंत्री बोलत होते.
व्यासपीठावर महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, आ. राजेंद्र राऊत, आ. राम शिंदे, मा. आ. व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, भैरवनाथ शुगर चे संस्थापक शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख महेश चिवटे, माऊली हरनावळ, , सभापती अतुल पाटील, आदिनाथ व मकाईचे े सर्व संचालक, जि प सदस्य तसेच प स सदस्य, भाजपा व बाळासाहेबांची शिवसेनेचे सर्व पदाधिकारी तसेच सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी आमदार नारायण पाटील, संचालिका रश्मी बागल व चेअरमन धनंजय डोंगरे यांच्या हस्ते मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री व महसुल मंत्री यांचे सत्कार करण्यात आले. यानंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कर्मयोगी गोविंदबापु पाटील यांनी कारखाना उभारणीसाठी त्याग केला व मोठे योगदान दिले आहे.
आदिनाथ हा भाडेपट्टी तत्वावर चालवण्यासाठी काहींनी प्रयत्न केला पण करमाळा तालुक्यातील आदिनाथ कारखान्याच्या सभासदांच्या भावना ओळखुन मी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे वर हा कारखाना सभासदांच्या ताब्यात राहण्यासाठी तात्काळ कार्यवाही करा असे आदेश दिले.
सावंत बंधूनी केवळ कागदोपत्री मदत न करता आर्थिक हातभार सुद्धा लावला. आमचे सरकार हे शेतकऱ्याला न्याय देणारे सरकार आहे. आम्ही सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला.
यामुळे राज्याच्या तिजोरीत अडीच हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडला. पण आम्ही शेतकऱ्यांचे हीत जोपासले. आता करमाळा हा भाग शुगरकेन बेल्ट म्हणून ओळखला जातो. शेतकर्यांंनीही वेळप्रसंगी आपली जबाबदारी ओळखून कारखान्यासच ऊस घालावा.
आम्ही आदिनाथ कारखान्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असे ठोस आश्वासन त्यांनी दिले. तर यावेळी महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लहान क्षमतेचे कारखाने जाणीवपूर्वक चालू द्यायचे नाहीत व मग ते कारखाने आर्थिक डबघाईला आले की भाडेपट्टी तत्वावर अथवा कमी पैशात विकत घ्यायचे असा प्रकार अनेक वर्षांपासून विरोधी मंडळी करत आहेत.
यामुळे सहकार धोक्यात येऊ लागला होता व ठराविक मंडळीच आर्थिकदृष्ट्या मोठी होत चालली होती. आम्ही सहकार जपणारे आहोत. यामुळे आता शेतकऱ्याला न्याय देणारे मुख्यमंत्री असल्याने यापुढे असले कारखाना खरेदी विक्री करण्याचे प्रकार थांबतील असा टोला त्यांनी पवारांचे नाव न घेता लगावला.
तर यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सुद्धा मुख्यमंत्री यांनी या अल्पावधीतच घेतलेल्या लोकहिताच्या निर्णयाची यादी कथन करुन आरोग्य विषयी व खास करून महिलांच्या सन्मान व आरोख्याविषयी सुरु केलेल्या नवीन योजनेविषयी माहीती दिली.
बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी कारखान्याच्या अडचणींचे विवरण करुन तालुक्यातील काही महत्त्वाच्या विकासकामांचीही पुर्तता झाली पाहिजे असे साकडे मुख्यमंत्री यांच्या कडे घातले. तर माजी आमदार नारायण पाटील यांनी कारखान्याचा उभारणीचा इतिहास सर्वासमोर मांडला.
कर्मयोगी गोविंदबापू पाटील यांनी कारखाना उभारणीसाठी केलेला त्याग आपल्या भाषणातून वर्णविला. तसेच आदिनाथ कारखान्याची स्थिती भक्कम व्हावी म्हणून खेळते कर्जापोटी राज्यशासनाकडे 25 कोटीची तातडीची मदत आदिनाथला करावी अशी मागणी केली.
कार्यक्मास जवळपास वीस हजार सभासद उपस्थित होते. मुख्यमंत्री व महसूलमंत्री हे स्वतंत्र हेलीकॉप्टरने कार्यस्थळावर आल्याने करमाळा तालुक्यातील जनतेत एक कुतूहलाचा विषय झाला. प्रास्ताविक रश्मी बागल यांनी केले तर आभार चेअरमन महेश डोंगरे यांनी मानले.
——————–मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले भाषण चालू असताना माजी आमदार नारायण पाटील यांना जवळ बोलावुन “नारायण आबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तुमच्या पाठीशी असून सर्व काही ठिक होईल” असे म्हणतात हजारोंच्या संख्येने सभासदांनी एकाच आवाजात घोषणा देऊन व टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत 30 ग्रामपंचायतीच्या पैकी तब्बल 21 ग्रामपंचायतीवर माजी आमदार नारायण पाटील यांची एकहाती सत्ता आल्याने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते नूतन सरपंचांचे सत्कार करण्यात आले.
Comment here