सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य द्या; एक महिन्यानंतर सर्व विभागांचा आढावा मला द्या; आ. संजयमामा शिंदे यांच्या प्रशासनाला सूचना

सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य द्या; एक महिन्यानंतर सर्व विभागांचा आढावा मला द्या; आ. संजयमामा शिंदे यांच्या प्रशासनाला सूचना

करमाळा ;(प्रतिनिधी अलीम शेख);

सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत आणि कोणाचीही अडवणूक होऊ नये म्हणून योग्य तो समनव्य ठेवून आवश्यक ती काळजी घेत वेळेत कामे करण्यावर भर द्या. एक महिन्यानंतर मी सर्व विभागांचा आढावा घेईल त्यावेळेस मला कामांमध्ये सुधारणा दिसली पाहिजे अशा सूचना आमदार संजयमामा शिंदे यांनी सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.

यावर्षी पाऊस चांगला पडला असून शेतकऱ्यांना पीक कर्जाबरोबरच शेती व इतर उद्योगासाठी आवश्यक असलेल्या सर्व योजनांचा लाभ नागरिकांना मिळण्यासाठी सर्व बँकांनी सहकार्याची भावना ठेवा, अशी सूचनाही बँकेच्या अधिकाऱ्यांना त्यांनी केल्या.

आमदार शिंदे यांनी काल मंगळवारी करमाळा पंचायत समितीच्या सभागृहात सर्व विभागातील प्रशासकीय कामाचा आढावा घेतला. तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उपअभियंता श्री. गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक श्री. चंदनशिवे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ऍड. राहुल सावंत, आदिनाथ कारखान्याचे माजी अध्यक्ष तात्यासाहेब मस्कर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उद्धव माळी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वामनदादा बदे ,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल, ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले आदी उपस्थित होते.

तहसीलदार ठोकडे यांनी करमाळा तालुक्यात कुणबी दाखले वितरणात वेगाने काम सुरु असल्याचे सांगितले. याशिवाय रस्ता केसची प्रकरणी निकाली लावली असून सध्या पावसामुळे स्थळ पहाणी करण्यात अडचणी येत आहेत. मात्र अशाही स्थितीत कोणाचीही अडवणूक होणार नाही याची खबरदारी घेतली असल्याचे सांगितले. तालुक्यातील घरकुलासाठी यादी मिळाल्यानंतर जप्त केलेली वाळू उपलब्ध करून दिली जाईल, असेही तहसीलदार ठोकडे यांनी सांगितले आहे.
गटविकास अधिकारी राऊत म्हणाले, करमाळा तालुक्यात घरकुलाचे कामे वेगाने सुरु आहेत. पाणी नसल्यामुळे काही ठिकाणी कामे पूर्ण करण्यासाठी अडचण होती.

सध्या रमाई घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. घरकुल बांधकामासाठी ‘डस’हा वाळूला पर्याय आहे. मात्र वाळूसाठी महसूल विभागाकडे लाभार्थ्यांची यादी दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय त्यांच्याशी संबंधित विभागाची माहिती त्यांनी यावेळी दिली.

जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता गायकवाड यांनी त्यांच्या विभागाकडून सुरु असलेल्या कामाची माहिती दिली. आचारसंहितेपूर्वी कामे पूर्ण करण्यावर आमचा भर असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – ‘जग बदलणारा बापमाणूस’ हे नव्या पिढीला प्रेरणादायी भाषेत बाबासाहेब सांगणारे पुस्तक; खा. वर्षा गायकवाड मुंबईत खा.वर्षा गायकवाड यांच्या हस्ते 13 व्या आवृत्तीचे प्रकाशन

उमरड येथे राजमाता अहिल्याराणी होळकर यांना अभिवादन; दहावीतील गुणवंतांचा ही झाला सत्कार

कृषी अधिकारी वाकडे म्हणाले, यावर्षी पाऊस चांगला झाला आहे. आणखी जादा पाऊस झाला तर पेरणीची पद्धत बदलेले. पीक बदल करण्यावर भर दिला जाईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. जादा दराने खत व बियाणे विक्रीची तक्रार आमच्याकडे आलेली आहे.

मात्र ‘एमआरपी’च्या पुढे विक्री होत नसेल तर त्यात कारवाई करता येत नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. ‘उमेद’चे जगताप यांनीही तालुक्यातील बचत गटाची स्थिती सांगितले. गावागावात कार्यरत असलेल्या ग्रामसंघाच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) तालुकध्यक्ष संतोष वारे, बळीराजा शेतकरी संघटनेचे अण्णासाहेब सुपनवर, भोसे येथील भोजराज सुरवसे, श्री. जगदाळे आदींनी यावेळी समस्या मांडल्या.

karmalamadhanews24: