राजुरीचा चिरा निखळला; गावचं भूषण मुरली भाऊ गेले..
केतुर (अभय माने) राजुरी गावचे भूषण, माजी पोलीस पाटील ,राजुरी गावचे आदर्श व अजातशत्रू व्यक्तिमत्व श्री रामचंद्र विश्वनाथ चिंचकर पाटील उर्फ मुरली भाऊ यांचे दुःखद निधन झाले. राजुरी गावच्या आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक विकासामध्ये मुरली भाऊंचा मोठा वाटा होता. त्यांना पंचांगाचे भरपूर ज्ञान होते.
राजुरी आणि पंचक्रोशीतील माणूस मोठे आशेने भाऊंकडे यायचा. मुलाला नोकरी लागेना, मुलीचे लग्न जमेना, घरी कोणी आजारी आहे या कारणापासून ते अगदी विहीर खोदण्यासाठी मुहूर्त, लग्नाची तारीख, लग्नाचे पंचांग या सर्व प्रश्नांवर भाऊंकडे उत्तर असायचे.
राजुरी परिसरातील लोकांना भाऊंचा चा मोठा आधार होता .भाऊंकडून पंचांग पाहून आल्यानंतर बाहेर येणारा माणूस हसतच बाहेर यायचा हे भाऊंच्या पंचांग पाहण्याच्या यशाचे गमक होते. राजुरी गावच्या इतिहासात जडणघडणीत भर घालणारी जी माणसे होती त्यामध्ये भाऊंचे स्थान निश्चितच वरच्या दर्जाचे होते .ते देवऋषी नव्हते पण पंचांग पाहून भविष्य सांगणारे देव माणूस मात्र नक्की होते.
भाऊंच्या पश्चात त्यांची दोन मुले ज्ञानेश्वर व रमाकांत, दोन मुली वंदना व वैशाली, बंधू श्री दत्तात्रेय, पुतणे, आणि त्यांच्या धर्मपत्नी बाई या सर्वांवरच मोठा आघात कोसळला आहे .
या अफाट दुःखातून सावरण्याची परमेश्वराने त्यांना शक्ती द्यावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
समस्त राजुरी ग्रामस्थांच्यावतीने भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली.
Comment here