कारचा भीषण अपघात, तीन जण जागीच ठार

कारचा भीषण अपघात; तीन जण जागीच ठार

इंदापूर तालुक्यातील भिगवणजवळ स्विफ्ट कारचा भीषण अपघात होऊन त्यात तीन जण जागीच ठार झाले. कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कारने पलटी खाल्ली. त्यात तिघांचा जागेवरच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. मृत तिघेही लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर-पुणे या लेनवर इंदापूर तालुक्यातील डाळज नं. १ गावाच्या हद्दीत ही स्विफ्ट कार (क्र. एम. एच. ४३/बी. एन. १४०२) वेगात जात होती. कारचा वेग खूपच जास्त होता. त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार तीनवेळा उलटली. ही कार पुण्याच्या दिशेने येत होती. भिगवण बसस्थानकापासून काही अंतरावर हा अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी झाला.

संदीप राजाभाऊ माळी (वय ३५ वर्षे). बालाजी केरबा तिडके (वय ४८ वर्षे) आणि सरस्वती राजाभाऊ माळी (वय ६१ वर्षे) अशी या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे तिघेही लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. चंद्रकांत रामकिशन गवळी (वय ५४ वर्षे) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जखमी चंद्रकांत रामकिशन गवळी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, भरधाव कार तीनवेळा पलटी खाल्ली. कारच्या बोनेटचा पार चेंदामेंदा झाला.

karmalamadhanews24: